पंढरपूर :
तीर्थांचे जें मूळ, व्रतांचे जें फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीये
ते आम्हा देखिले आपुल्या नयनीं, फिटली पारणी डोळियांची
विठूरायाच्या दर्शनाने तृप्त झालेल्या भाविकांची अवस्था या ओवीत वर्णिल्याप्रमाणे झाली आहे. आज आषाढी वारीसाठी पंढरपुरात संतभार लोटला आहे. सुमारे अठरा दिवस चालून आलेले भाविक सोमवारी पंढरपुरात दाखल झाले. त्यामुळे एकच गर्दी झाली. आज, एकादशीच्या पहाटे विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. सोमवारी मुख्य पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असल्या, तरी गावोगावच्या छोट्या-मोठ्या दिंड्या आजही पंढरपुरात दाखल होत होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, रेल्वे व खासगी वाहनातूनही भाविक पंढरपुरात आले असून, त्यांची संख्या सुमारे १० ते १२ लाख एवढी आहे. विविध मठ व राहुट्यांमधून राहिलेले वारकरी भल्या पहाटेपासूनच चंद्रभागेच्या स्नानाचा लाभ घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते. त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा जणू महापूरच आला होता.
वाळवंटात दाखल झालेले भाविक आज विविध खेळ खेळत होते. भजन-कीर्तनाचा गजर होत होता. महाद्वार घाटातून वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना मोठी कोंडी झाली होती. महाद्वार व पश्चिमद्वार भाविकांनी फुलून गेला होता. भक्त पुंडलिक व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांना ४८ तासांपेक्षाही जास्त वेळ लागत आहे. एकंदरीत पंढरीतील हा आषाढी वारीचा सोहळा नेहमीप्रमाणेच भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.